मुंबई/वसई :-
वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, स्नेहा दुबे पंडित यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या भाविक नागरिकांच्या सोयीसाठी वसई आगारातून कोकण विभागाकडे विशेष एस.टी. बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भातले एक लेखी निवेदन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना शुक्रवारी मंत्रालयात सादर करण्यात आले.
प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात लाखो नागरिक आपल्या मूळ गावाकडे, विशेषतः कोकणात, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी व पूजेसाठी जात असतात. मात्र, या काळात एस.टी. बससेवेची अत्यंत कमतरता जाणवते भाविकांना तिकीट मिळण्यात अडचणी येतात, तसेच प्रवासात गैरसोयीचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, दि.२२, दि.२३ ऑगस्ट ते दि.२९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी विशेष एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
यामुळे वसई मतदारसंघातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावात जाणे अधिक सुलभ व सुसज्ज होईल.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे कोकणात गणपती घरी नेण्याची लोकांची आसक्ती व श्रद्धा लक्षात घेता एस.टी. महामंडळाने विशेष बसेसची योजना आखावी आणि ही सेवा सुरु झाल्यास वसईतील नागरिकांची मोठी गैरसोय टळेल.
या मागणीस लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.
![]()
