“वसई पूर्वेकडे औद्योगिक आणि नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे पावसाळ्यात येथे वाहतूक ठप्प होते. जनसंपर्क तुटतो.अनेकांना रेस्क्यू करावे लागते खाडीचे रुंदीकरण व खोलीकरण झाल्यास पाणी निचऱ्याचा मार्ग मोकळा होईल व येथील नागरिकांना दिलासा मिळेल”
नारायण मानकर – माजी महापौर तथा बविआ जेष्ठ नेते
वसई :- आशिष राणे
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नवघर पूर्वेकडील जनजीवन विस्कळीत होत असते संपूर्ण भाग जलमय होऊन गोखिवरे, वालीव नवघर (पूर्व) व सातीवली येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत व नागरी वसाहतीत पूर परिस्थिती निर्माण होते.
पर्यायाने दळणवळणात अडचण निर्माण होऊन, नागरीकांची गैरसोय होते त्यामुळे नवघर (पूर्व) ते ससुनवघर खाडीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे यासाठी माजी महापौर नारायण मानकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत मागणी केली आहे.

ज्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे बहुतांश पावसाळी पाणी हे नवघर पूर्व ते ससुनवघर खाडी मार्फत समुद्राला मिळते. या खाडीच्या पूर्व भागातील तुंगारेश्वर नदी, पेल्हार, वालीव, सातीवली, गोखिवरे, नालासोपारा पूर्व, एव्हरशाईन, वसंतनगरी व नालासोपारा पश्चिम, गास, निर्मळ, सांडोर, सालोली व नवघर-माणिकपूर या पश्चिम भागातील पावसाळी पाणी रेल्वे कल्व्हर्ट क्रमांक ७८ मार्गे खाडीला मिळते.विकास आराखड्यात सध्या अस्तीत्वात असलेल्या खाडीची रुंदी ४० मीटर दाखविण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत हा नाला ५ ते १० मीटर रुंद आहे.
यात दोन्ही बाजूनी टीवराची झाडे आहेत. त्यात खाडीत वाहून आलेला कचरा देखील टिवरांना अडकतो. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणखी कमी होऊन पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होते असे माजी महापौर नारायण मानकर यांनी महापौर अजीव पाटील याना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

खाडीची खोली व रुंदी वाढविल्यास पाण्याचा निचरा सुलभपणे होऊन ते पाणी नवघर पूर्व ते ससुनवघर मार्गे उल्हास नदीला मिळेल. तसेच सध्या प्रस्तावित असलेली ठाणे, भाईंदर नायगाव रो रो सेवा या मार्गात प्रस्तावित केल्यास नागरीकांची सोय होऊन वेळेची व पैशाची बचत होईल अशा सूचना माजी महापौर नारायण मानकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
एकीकडे पावसाळी नियोजनाची लगबग महापालिकेकडून सुरु आहे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हे शहरात दौरे करत आहेत तर महापौर अजीव पाटील पावसाळी उपाययोजनांसाठी लक्ष केंद्रित केले आहे त्यातच नवघर पूर्वेकडील खाडीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा निर्णय केव्हा घेतला जाईल याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.
————
![]()
