आधी माजी आयुक्त पवार सुटले आता रेड्डी हीं सुटणार…??
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणाच्या चौकशीत ईडीने वसई विरार महापालिकेशी संबंधित कोट्यावधीचा बांधकाम घोटाळा उघडकीस आणला होता. या बड्या कारवाईत निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस.रेड्डी हे मागील ६ महिन्या पासून कारागृहात असून सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखाड यांच्या खंडपीठाने हे प्रकरण ‘फर्स्ट ऑन बोर्ड’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वसई :- आशिष राणे
वसई विरार महापालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या कारवाईला आव्हान दिले आहे. रेड्डी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. रेड्डी मागील ६ महिन्यापासून तुरुंगात आहेत.

नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणाच्या चौकशीत ईडीने वसई विरार शहर महानगरपालिकेचा कोट्यावधीचा बांधकाम घोटाळा उघडकीस आणला होता. मागील वर्षी मे -२०२५ महिन्यात महानगरपालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय.एस.रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थाना सह वसई विरार मधील १३ ठिकाणी ईडीने छापे घातले होते. यावेळी रेड्डी यांच्या घरातून ३२ कोटींचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली होती.
वसई विरार मधील इमारतींना परवानगी देताना पालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार प्रत्येक इमारतीत प्रति चौरस फुटामागे २५ ते ३० रुपये तर रेड्डी १० रुपये घेत होते. त्यातून कोट्यवधींची माया जमवली होती.

यांनतर ऑगस्ट महिन्यात रेड्डी आणि माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक करण्यात आलो होती. मात्र माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर- २०२५ महिन्यात जामीन मंजुर केला होता.
आता वाय.एस. रेड्डी यांनी देखील ईडीच्या कारवाईला थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणात रेड्डी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास पहवा तर ईडी कडून विधिज्ञ् चैतन्य पेंडसे यांनी आपली बाजू मांडली.

आता सोमवार दि.२ फेब्रुवारी रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखाड यांच्या खंडपीठाने हे प्रकरण ‘फर्स्ट ऑन बोर्ड’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे यापूर्वीच जामीनावर सुटलेले माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या सुटकेनंतर वाय.एस. रेड्डी यांना हीं जामीन मिळतो कां ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें.
![]()
