‘आधी केले मग सांगितले’, सल्ल्याला प्रत्यक्ष नेत्र व त्वचा दाना सारख्या महान कृतीतून दिलं उत्तर…
या तत्वानुसार विरारमधील भातवकर व नायगाव स्थित पारधी व मोरे कुटूंबियांचा सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय समाजात नक्कीच यापुढे हीं एक आदर्श कृती घडवेल किंबहुना ‘नेत्र व त्वचा दान’ करून सुनयना ताईंनी अनेकांना जीवन प्रदान केलंय..
वसई :- आशिष राणे
वसई तालुक्यातील सेंट्रल पार्क, विरार पश्चिम येथे राहणाऱ्या सुनयना यशवंत भातवकर (६५) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यूच्या या अत्यंत दुःखद क्षणीही त्यांच्या कुटुंबीयांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे, सुनयना यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे नेत्रदान आणि त्वचादान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
या प्रेरणादायी निर्णयामागे सुनयना ताई यांच्या कन्या प्रीती पारधी (नायगाव) यांची प्रमुख भूमिका राहिली होती.
दरम्यान अवयवदाना सारख्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून “देहमुक्ती मिशन” च्या माध्यमातून सक्रिय असलेल्या प्रीती यांनी, या कठीण काळात स्वतःला सावरत आपली बहिण स्वाती जितेंद्र मोरे आणि भाऊ स्वप्निल भातवकर यांच्याशी तातडीने चर्चा केली.
सल्ल्याला कृतीतुन मिळालं उत्तर…
तिघांनीही एकमताने नेत्रदान आणि त्वचादान करण्याचा निर्णय घेतला. ‘आधी केले मग सांगितले’ या तत्त्वानुसार त्यांनी पुन्हा एकदा हे कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
विशेष म्हणजे “देहमुक्ती मिशन” तर्फे या अवयवदान प्रक्रियेचे समायोचित समन्वयक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सर्व सोपस्कार पार पाडले.
नेहमी प्रमाणे मध्यरात्री संपर्क साधणे अवघड असतानाही, या महान कार्यात समाजातील अनेक लोकांनी आवश्यक सहकार्य केल्याची माहिती स्वतः अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी दिली.
एकूणच या दान प्रक्रियेचा भाग म्हणून, आय बँक रिसर्च सेंटर, वडाळा येथील तंत्रज्ञ उत्तम कुमार यांनी नेत्रदान स्वीकारले, तर नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली, नवी मुंबई येथील कुमारी प्रभावती आणि त्यांच्या टीमने त्वचादानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
आजचा समाज रक्तदानालाही नकार देण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून नेत्रदान, त्वचादाना सारख्या महान कार्यात आज सक्रियपणे सहभागी होत आहे. याचे खूप समाधान वाटत असल्याचे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.
इतकंच नव्हे तर विरार स्थित भातवकर व त्यांच्या जोडीला असलेलं पारधी व मोरे अशा तीनही कुटुंबाने दाखवलेली संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल यात अजिबात शंका नाही
तर एका कुटुंबाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मृत्यूच्या नंतरही सुनयना ताई यांच्या जीवनाची ज्योत यापुढे हीं जनंमाणसांत तेवत राहण्यास अधिक बळ मिळेल.
![]()
