जनशक्ती आघाडी कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी काढली स्वतःचीच अंत्ययात्रा…. आम्हाला मृत्यूदंड द्या…!
वसईकर नागरिकांचे अनोखे आणि हृदयद्रावक आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी चक्क जमावबंदीचा आदेश पुढे करून हे आंदोलन रोखता येईल का याचा केविलवाणा प्रयत्न केला.
तर पोलिसांच्या जाचाला आणि भूमाफियांशी असलेल्या त्यांच्या संगनमताला कंटाळून, जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला एकदाचा मृत्यूदंड द्या अशी मागणीच आम्ही करीत असू तर जमावबंदी काय म्हणता….आम्हाला एकदाचे मारूनच टाका
अशी आर्त हाक देत जनशक्ती आघाडी चे कार्यकर्ते व वसईकर शेकडो नागरिकांनी अक्षरशः गळ्यात फार्स टाकीत रस्त्यावर स्वतःचीच अंत्ययात्रा काढून वसई पोलीस उपायुक्त (झोन-२) यांच्या कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन छेडत समस्त पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

वसई :- आशिष राणे
वसईतील पोलीस यंत्रणा, भूमाफिया आणि बड्या विकासकांमध्ये निर्माण झालेल्या कथित घनिष्ठ संबंधांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळणे कठीण झाले असून, या अन्यायाचा तीव्र निषेध करण्यासाठी वसईकर भूमिपुत्रांनी गळ्यात फास लटकवित व शवपेटी हातात घेत भर रस्त्यावर स्वतःचीच अंतयात्रा काढीत वसई रोड येथील डीसीपी -झोन २ कार्यालयावर सोमवारी सकाळी धडक मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले.
माणिकपूर पोलीस स्टेशन वरून निघालेला हा मोर्चा साधारण तास दीड तासानंतर थेट वसईच्या डीसीपी झोन- २ च्या कार्यालयाबाहेर जाऊन धडकला, यावेळी या मोर्च्यात प्रत्यक्ष गळ्यात फास व शव पेटी आणि आम्हाला मृत्यूदंड द्या चे मोठाले फलक भिरकवत शेकडो नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात स्वतःचीच अंत्ययांत्रा काढली होती.यावेळी रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सध्या वसई-विरारमध्ये भूमाफिया आणि धनदांडग्या विकासकांचे वर्चस्व वाढले असून पोलीस यंत्रणा त्यांच्या दबावाखाली किंवा हितसंबंधांमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.
अनेकदा जमिनी बळकावणाऱ्या विकासकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही, उलट आपली हक्काची जमीन वाचवू पाहणाऱ्या मूळ जमीन मालकावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात.
आपल्या अधिकार पदाचा अमर्याद वापर करून सामान्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया किंवा हद्दपारी सारखी गंभीर पावले देखील उचलली जात असल्याच्या तक्रारी समाजात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
पोलिसांकडून होणाऱ्या या मानसिक आणि कायदेशीर त्रासामुळे भूमिपुत्रांच्या अस्तित्वावरच गदा आली असून, जणू या यंत्रणेने नागरिकांच्या अस्तित्वाविरुद्ध मृत्युदंडच ठोठावला आहे, अशी भावना आंदोलकांनी याप्रसंगी व्यक्त केली.
दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून भूमाफिया, विकासक आणि पोलीस यंत्रणेच्या अभद्र युतीमुळे समाजासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर आव्हानांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. यावेळी नायगाव, जुचद्र, वसई माणिकपूर, पेल्हार, सोपारा आदी भागातील अनेक पीडित नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

Adv✅
परिणामी वसई विरार जनशक्ती आघाडीच्या आंदोलनकर्त्यास सामोरे जाताना वसईच्या डीसीपी झोन-२ च्या महिला अधिकारी पौर्णिमा श्रींगी चौगुले यांनी आंदोलनकर्त्याचे सर्व म्हणणे आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि स्पष्ट केले की, ज्या ज्या पोलिसांच्या विरोधात तक्रारी असतील त्याबाबत लेखी निवेदन देण्यात यावे.
त्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन हीं दिल्याचे मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले,
सोबत शेतकरी भूमिपुत्र यांच्यावर अन्याय केला जाणार नाही व याबाबत प्रत्येक महिन्यातून एकदा पोलिस- नागरिक असा जनता दरबार ही आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.

Adv ✅
या आंदोलनात वसई विरार जनशक्ती आघाडीचे मिलिंद खानोलकर, मॅकेन्झी डाबरे, अनिल चव्हाण, डॉमिनिका डाबरे, सुमित डोंगरे व फादर मायकल जी, वेरोनिका रिबेलो व शेकडो कार्यकर्त्यांनी या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले.
******************************************
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
Mymarathi7.com
![]()
